काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ...
-श्रीराम सीताराम मोहिते
अटलजींची कविता हे व्यष्टी आणि समष्टीच्या सर्वंकष उन्नयनासाठी आळवलेले एक चिंतनशील स्वगत म्हणता येईल. प्रखर देशनिष्ठा, चिरंतन मानवी मूल्यांवरचा अढळ विश्वास, भवतालातील दहशतीविषयीची भयव्याकुळता, या भयव्याकुळतेवर मात करण्याचा दुर्दम्य आशावाद आणि जन्ममृत्यू विषयीच्या अपार कुतुहलातून प्रकटणारी प्रगल्भ चिंतनशीलता ही अटलजींच्या कवितेतील काही प्रमुख आशयसूत्रे सांगता येतील. संस्कृतप्रचुर भाषाशैलीचा अनवट वापर, काव्याच्या आंतरिक लयीचे भान, समकालीन पेचप्रसंगांना दिलेली ऐतिहासिक-पौराणिक संदर्भांची जोड, प्रखर राष्ट्रनिष्ठेसह येणारा मानवी मूल्यांचा आग्रह, आणि आत्मोन्नतीची प्रगाढ तळमळ या वैशिष्ट्यांमुळे अटलजींच्या कवितेतून एक अस्सल काव्यात्मक भान व्यक्त होताना दिसते. मेरी इक्यावन कविताएँ’ हा त्यांचा संग्रह १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यानंतरच्या काळात श्रेष्ठ गझलगायक जगजितसिंग यांचा स्वरसाज लाभलेला 'संवेदना' या अल्बममधून अटलजींनी कविता सर्वदूर पोहोचली. अटलजींच्या काव्यातील तरल चिंतनशीलता जगजीतजींच्या आवाजात अधिकच गहिरा परिणाम करून जाते. 'क्या खोया क्या पाया' या कवितेतून व्यक्त होणारी कवीची आंतरिक हुरहूर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहील अशी आहे. अटलजींचे आजोबा आणि वडील हे दोघेही उच्च दर्जाचे साहित्यिक व कवी होते त्यामुळे ‘कविता मुझे घुट्टीमें मिली थी' म्हणजेच ‘कविता आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे,’ असे अभिमानाने सांगणारे अटलजी या कविकुळाचे हळवे सांगाती होते. ‘आपण राजकारणात शिरलो नसतो तर कवी-साहित्यिक झालो असतो,’ असेही आपल्या एका मनोगतातून सांगितले आहे.
त्यांची कविता जगण्याकडे प्रगल्भपणे पाहते आणि त्यातल्या अंतःस्तरावरील अनेक पेचांना सहजपणे स्पर्श करत जाते. अगदी प्रत्येक वाढदिवसाला ते एक कविता लिहायचे. जणू एका काव्यात्म साक्षित्वाने आपल्याच जीवनप्रवासाकडेच वळून पाहण्याचा हा प्रयत्न होता. त्यांच्या अशा कवितांमधून मृत्यूविषयीची चिंतनशील समज व्यक्त होते. कधी ती 'कितने पत्थर शेष न कोई जानता? अशा हताशेतून जाणवते तर कधी आपल्या व्यक्तित्वातला 'हर पच्चीस दिसम्बर को, जीने की एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, नए मोड़ पर, औरों से कम, स्वयं से ज्यादा लड़ता हूँ।' असा अंतर्बाह्य झगडा व्यक्त करते. 'यक्षप्रश्न' या त्यांच्या कवितेत ते लिहितात, 'जो कल थे, वे आज नहीं हैं। जो आज हैं, वे कल नहीं होंगे। होने, न होने का क्रम, इसी तरह चलता रहेगा, हम हैं, हम रहेंगे, यह भ्रम भी सदा पलता रहेगा।' जगण्यातल्या अशाश्वततेचे इतके तटस्थ भान व्यक्त करणारी कविता अटलजी लिहू शकले ते 'असणे,जगणे आणि व्यक्त होणे' यातल्या विलक्षण अतूट अशा भानामुळेच. म्हणूनच जगण्याचे खरे साफल्य कशात आहे ते त्यांना अगदी अचूकपणे आकळले होते.
‘अंतिम यात्रा के, अवसर पर,
विदा की वेला में’
जब सब का साथ छूटने लगता है,
शरीर भी साथ नही देता,
तब आत्मग्लानी से मुक्त,
यदि कोई हाथ उठाकर यह कह सकता है,
कि उसने जीवन में जो कुछ किया,
ही समझकर किया,
किसी को जान बूझकर चोट पहूँचाने के लिये नही,
सहज कर्म समझकर किया,
तो उसका अस्तित्व सार्थक है,उसका जीवन सफल है।’
अशा आध्यात्मिक स्तरावर पोहोचणारी काव्यात्मदृष्टी या प्रगल्भ भानामुळेच त्यांना प्राप्त झाली होती. 'इतना काफ़ी है अंतिम दस्तक पर, खुद दरवाज़ा खोलें!' अशा प्रगाढ आत्मभानाकडे जाणारी ही कविता जीवनाच्या 'श्रेयस-प्रेयसाचा' अभिन्न प्रवास रेखाटते.
जगभरातल्या नानाविध दहशतीची रूपे, आणि त्याविषयीची अपार चिंता अटलजींच्या कवितेतून बऱ्याचदा व्यक्त झालेली दिसते.
'इस जीवन से मृत्यु भली है,
आतंकित जब गली गली है,
मैं भी रोता आसपास जब,
सड़कों पर इतनी धूल उड़ती है,
कि मुझे कुछ दिखाई नहीं देता।
मैं सोचने लगता हूँ।'
या दहशतीची भयव्याकूळता व्यक्त करणारी त्यांची 'हिरोशिमा की पीड़ा' ही एक लक्षणीय कविता आहे. हिरोशिमा नागासाकीचा नरसंहार त्यांच्यातील कवीला प्रश्नमग्न बनवतो.
'मैं सोचने लगता हूँ कि,
जिन वैज्ञानिकों ने अणु अस्त्रों का आविष्कार किया था,
वे हिरोशिमा-नागासाकी के भीषण नरसंहार के समाचार सुनकर, रात को कैसे सोए होंगे?'
त्यांची कविता पौराणिक ऐतिहासिक संदर्भानी युक्त आहे. महाभारत, रामायण, पुराणकथा यांचे संदर्भ ते फारच अर्थपूर्ण रीतीने कवितेतून गुंफतात. त्यांच्या कवितेतली अस्सल भारतीयत्वाची जाणीव या संदर्भातून उजागर होत जातात. कधी त्यांची कविता 'कौरव कौन कौन पांडव, टेढ़ा सवाल है। दोनों ओर शकुनिका फैला कूटजाल है। असा समकाळाच्या अभेद्य कूटप्रश्नाकडे आपले लक्ष वेधते. तर कधी
नचिकेताच्या प्रश्नोपनिषदाचा संदर्भ समकालीन परिप्रेक्षात शोधते.
प्रत्येक नया नचिकेता,
इस प्रश्न की खोज में लगा है।
सभी साधकों को इस प्रश्न ने ठगा है।
शायद यह प्रश्न, प्रश्न ही रहेगा।
यदि कुछ प्रश्न अनुत्तरित रहें
या कवितेतून एकटेपणाची हुरहूर अनेकदा तीव्रतेने व्यक्त होते. ‘जब वह एकांत में बैठकर विचार करता है, वह एकांत, फिर घर का कोना हो, या कोलाहल से भरा बाजार !’ यासारख्या ओळींमधून भवतालच्या कोलाहलातही एकांत जपण्याची कला त्यांना अवगत होती हे लक्षात येते. म्हणूनच ते ‘पृथिवी पर, मनुष्य ही ऐसा एक प्राणी है, जो भीड में अकेला और अकेले में भीड से घिरा अनुभव करता है ।’ अशा सूचक निरीक्षणशक्तीतून या एकांताच्या अनेक मितींचा वेध घेते.
मानवतावादाच्या व्यापक पायावर उभा असणारी प्रगल्भ राष्ट्रवादी जाणीव, जगण्याच्या सूक्ष्म अंतःस्तराचा वेध घेण्याची काव्यात्म शक्ती आणि सतत नव्या स्वप्नांकडे झेपावणारा , इतरांना त्यासाठी प्रेरणा देणारा अक्षय आशावाद यामुळे अटलजींची कविता आपला अमीट ठसा उमटवणारी आहे. ती सतत जगण्यातल्या निखळतेकडे आपल्याला खेचत राहते. आपल्या छोट्या मोठ्या व्यथांनी ठेचाळणाऱ्या मनाला अभिव्यक्तीची चेतना पुरवते.
'टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी
अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ'
अटलजींची कविता सतत व्यथेच्या दारुण अगतिकतेवर मात करण्याचे स्वप्न दाखवते आणि काळाच्या कपाळावर आपली एक ठसठशीत आणि अमीट अशी नाममुद्रा उमटवते.
-श्रीराम सीताराम मोहिते
Comments
Post a Comment